बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या शृंगऋषीगडाच्या दुसऱ्या ‘नारळी सप्ताहाची’ सांगता सुरेशानंद शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी काल्याचे कीर्तन सादर करताना शास्त्रीजींनी आपल्या ओघवत्या शैलीत भगवंताच्या बाललीलांचे आणि काल्याचे महत्त्व विशद केले.
येथे सात दिवस अखंड हरिनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा, किर्तन महोत्सव असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आणि श्रवणासाठी गर्दी केली होती. कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी हेलिकॉप्टरद्वारे शृंगऋषीगडावर, महंत सुरेशानंद महाराज शास्त्री व हजारो भाविक भक्तांवर फुलांचा वर्षाव करून आगळावेगळा सन्मान केला. या पुष्पवृष्टीने संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साहपूर्ण झाला. या सोहळ्यासाठी आमदार सुरेश आण्णा धस, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे, भारत शिंगाडे, भाजप नेते नवनाथ पडळकर, पाथर्डी नगराध्यक्ष अभय आव्हाड, स्नेहाताई सोनकाटे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, रामहरी महानोर, जि प सदस्य भाजप ता.अध्यक्ष गावडे साहेब, युवा उद्योजक पिंटू शेट खेडकर, अँड सचिन कोळेकर आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार धस यांनी यावेळी भाविकांना संबोधित करताना श्रृंगऋषी गडाचा भारतातील प्राचीन व पौराणिक इतिहास उलगडून सांगितला. तसेच ही पावन भूमी म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहे,” असे गौरवोदगार त्यांनी काढले. “महंत सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या अथक परिश्रमातून व दिव्य आयोजनातून हा नारळी सप्ताह यशस्वी झाला. हजारो भाविकांना एकत्र आणून धर्मजागृतीचे हे कार्य कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत आमदार धस यांनी महाराज व भक्त परिवाराचे कौतुक केले. आमदार सुरेश धस यांनी पुढील वर्षी 2027 मध्ये होणाऱ्या तिसऱ्या नारळी सप्ताहाचे नारळ महंत महाराजांकडून स्वीकारून कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली.
तसेच सर्व भक्त परिवाराला पुढील वर्षी आठ दिवस सेवा करण्यासाठी स्नेहपूर्वक निमंत्रण दिले. याप्रसंगी आमदार लंघे पाटील, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे व डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले. त्यांनी शृंगऋषी महाराजांचे जीवनचरित्र, गडाचे महत्त्व व वारकरी संप्रदायातील त्यांचे स्थान याबद्दल सविस्तर माहिती देऊन भाविकांमध्ये प्रबोधन केले.
या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी गड समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात या सोहळ्याची सांगता झाली.

